Results News - RTMNU Summer 2019 Results- Click Here..

Search Any Result / Job :

Wednesday, November 5, 2014

ZP Yavatmal Recruitment Written Exam Cancelled

ZP Yavatmal Recruitment Written Exam Cancelled 



जिल्हा परिषदेतील पदभरती घोटाळ्यातील पेपरफुटीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तारतंत्री या चार संवर्गातील पदांसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी मंगळवारी घेतला. 
दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांची दुपारी तब्बल दीड तास चौकशी केली. पेपरफूटप्रकरणी जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा रद्द केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळ जिल्हा परिषदेतील चार संवर्गासाठी २ नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा पेपर आपण स्वत: १ नोव्हेंबरला मध्यरात्री तयार केला. हा पेपर औरंगाबाद येथे फुटल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी २ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फॅक्सद्वारे दिली. याप्रकरणी मंगळवार दि. ३ नोव्हेंबरला औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात आले. त्यांनी आरोपींकडून जप्त केलेल्या उत्तरपत्रिकेची माहिती दिली. या प्रकरणासंदर्भात लेखी जबाबही घेतले. पोलिसांनी दिलेल्या उत्तरपत्रिकेशी विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता आणि तारतंत्री यांच्या उत्तरपत्रिका जुळत असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा निवड समितीच्या उत्तरपत्रिकेसोबत आरोपींजवळची उत्तरपत्रिका ७0 टक्के मिळतीजुळती असल्याचे आढळले आहे. मात्र पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेली मूळ उत्तरपत्रिका दिलेली नाही. त्याची प्रत द्यावी, अशी लेखी मागणी आपण दुसर्‍यांदा करणार आहे. 
जिल्हा निवड समितीचा पेपर लिक झाल्याचे दिसून येते. जाहीर झालेल्या निकालामध्ये विस्तार अधिकारी संवर्गातील दोन विद्यार्थ्यांना २00 पैकी १६६ आणि १४२ असे गुण मिळाले आहेत. कनिष्ठ अभियंता या पदासाठी उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ४५ टक्के म्हणजे २00 पैकी ९0 गुणही कुणी घेतलेले नाही. यावरून नेमका पेपर फुटला की नाही असाही संभ्रम निर्माण होतो. मात्र उत्तरपत्रिका मिळतीजुळती असल्याने ही परीक्षा रद्द केली आहे. उर्वरित १0 पदांसाठी असलेली परीक्षा ८ नोव्हेंबरपासून सुरळीत घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. जिल्हाधिकारी महिवाल औरंगाबादमध्ये सीईओ असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तीने चुकीचा वापर केल्याची शक्यता आहे काय, असे विचारले असता याबाबत तपासणी केली जाईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड, प्रभारी माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते.

जिल्हा परिषद पदभरती प्रकरणातील पेपरफुटीचे तार जिल्हाधिकारी कार्यालयाशी जुळतात काय, याच्या चौकशीसाठी औरंगाबादचे पोलीस पथक यवतमाळात तळ ठोकून आहे. या पथकाने मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची तब्बल दीड तास चौकशी केली. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या दोन स्वीय सहायकांसह पाच जणांना औरंगाबाद येथे चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार लवकरच पोलिसांच्या जाळ्यात दिसतील, अशी माहिती औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.
यवतमाळ जिल्हा परिषदेत विविध संवर्गासाठी पदभरती घेण्यात येत आहे. २ नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. मात्र औरंगाबाद येथे अटक झालेल्या ११ जणांच्या टोळक्यामुळे ही भरती प्रक्रियाच संशयाच्या भोवर्‍यात सापडली. या आरोपींजवळ उत्तर तालिका सापडल्या आहेत. दहा ते पंधरा लाख रुपयांमध्ये उमेदवारांना ही उत्तरतालिका परीक्षेपूर्वीच देण्यात आली.
सुमारे ४0 जणांना ही उत्तर तालिका विकण्यात आल्याची कबुली अटकेतील विक्रीकर निरीक्षकासह ११ जणांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह आणि आर्थिक गुन्हे शाखेपुढे दिली. अद्याप या आरोपींनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचे नाव उघड केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी ही परीक्षा प्रक्रिया राबविणार्‍या जिल्हा निवड समितीतील सदस्यांपैकी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास चालविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वातील पथक मंगळवारी सकाळी ११ वाजता यवतमाळात दाखल झाले.
त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या निवासस्थानी जावून त्यांची तब्बल दीड तास चौकशी केली. जिल्हाधिकारी महिवाल यांनी परीक्षा प्रक्रियेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.
१ नोव्हेंबरला आपण स्वत: विविध संवर्गातील पदांच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या. या प्रश्नपत्रिका जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या कक्षात एका खासगी झेरॉक्स व्यावसायिकाकडून मशीन आणून पिंट्र काढल्या.
त्यानंतर दोन स्वीय सहायक आणि शिपायांच्या मदतीने त्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या. त्यामुळे या घटनेत जिल्हा निवड समितीचा कुठलाही सहभाग नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सावंत यांनी ते दोन स्वीय सहायक, शिपाई आणि झेरॉक्स व्यावसायिक यांची नावे, मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला. तसेच या पाच जणांना चौकशीसाठी वेळोवेळी औरंगाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखा कार्यालयात उपस्थित राहण्याची नोटीस बजावली.

No comments:

Post a Comment

Thanks For Visiting www.resultshub.net

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Google+ Followers..Join Now

Search Results, Jobs..